कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर

शरीराला आवश्यक असणारे एकवेळचे अन्नही जेव्हा उपलब्ध होत नाही, त्या वेळी वैद्यकीय उपचार घेण्याचा विचार ही तर चैनच म्हणावी लागेल. गरिबीमुळे शिक्षण नाही, त्यामुळे स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या बाबी दुर्लक्षित राहतात. पुरेसे अन्न मिळत नाही म्हणून कुपोषण येते आणि आरोग्यविषयक समस्या जटिल होत जातात. भारतात कुपोषणाची समस्या सर्वाधिक असल्याचे विविध अहवाल सांगतात. झपाट्याने विकास होत असला, शहरे आणि गावांमधील सीमा धूसर होत असली, तरी ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. ग्रामीण, दुर्गम भागांमध्ये लहान मुले आणि महिलांमध्ये कुपोषण, अशक्तपणा, रक्ताल्पता यांसारख्या समस्या अजूनही मोठ्या प्रमाणावर कायम आहेत. या मूळ समस्यांना चिकटून मोठ्या होत जाणार्‍या आरोग्यविषयक समस्यांची यादी खूप मोठी आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

मात्र योग्य दिशेने आणि शास्त्रशुद्ध संशोधनाने प्रयत्न केल्यास अशा समस्या असलेल्या ठिकाणांची परिस्थिती पालटू शकते, हे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात् सद्गुरु श्री अनिरुद्धांनी (बापुंनी) दाखवून दिले आहे.

२००४ सालापासून कोल्हापूर शहरापासून ३० किलोमीटर दूरवर असलेल्या पेंडाखळे या लहानश्या खेड्यात आरोग्य शिबिर भरविण्यास सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेरणेने सुरुवात झाली. आज चौदा वर्षानंतर पेंडाखळे आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमधील परिस्थिती पुरती पालटलेली दिसते. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, दिलासा मेडिकल ट्रस्ट ऍण्ड रिहॅब्लिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्धाज् हाऊस ऑफ फ्रेंडस व संलग्न संस्था एकत्र येऊन व्यापक प्रमाणात या ‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरा’चे आयोजन करतात.

‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरा’ची व्यापकता, यासाठी संस्थेच्या श्रद्धावान कार्यकर्त्यांनी केलेले सर्वेक्षण, अभ्यास, आखणी आणि नियोजन या सर्व गोष्टी पाहून थक्क व्हायला होते. देशात अनेक ठिकाणी विविध संस्था आरोग्य शिबीराचे आयोजन करीत असतात. मात्र ‘कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य शिबिरा’च्या आयोजनाचा उद्देश केवळ आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप इतकाच नसून आरोग्यविषयक समस्यांशी निगडित मूळ कारण उपटून टाकणे हा आहे. रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा रोगास प्रतिबंध करणारे उपाय करणे हा मूलमंत्र या शिबिरातून जपला गेला आहे. यासाठी शिबिराचे आयोजन करण्यापूर्वी शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो, तसेच वर्षभर पाठपुरावा चालतो. सर्व समस्यांना सर्वांकष विचार केला जातो.

संस्थेतर्फे आरोग्य शिबिरासाठी पेंडाखळे या गावाचीच निवड का करण्यात आली? हा प्रश्‍न पडू शकतो. कोल्हापूर शहरापासून अवघ्या तीस किलोमीटवर असणार्‍या पेंडाखळे व आजूबाजूच्या गावात कुपोषण व आरोग्य विषयक समस्या भयावह होत्या. बहुसंख्य गावकरी आर्थिक समस्येने ग्रस्त होते. येथील नागरिकांचे राहणीमान शिबिर भरविण्यासाठी आवश्यक निकषांमध्ये बसत होते. याशिवाय कोल्हापूर व आजूबाजूच्या विभागात संस्थेच्या शिस्तबद्ध श्रद्धावान कार्यकर्त्यांची मोठी फळी उपलब्ध होती, म्हणूनच या भागाची निवड करण्यात आली. हे शिबिर २००४ साली पहिल्यांदा पेंडाखळे जवळच असणार्‍या करंजफेण या गावात भरविण्यात आले होते, तर २००५ पासून हे शिबिर पेंडाखळेमध्ये भरविले जाऊ लागले.

सद्गुरू श्रीअनिरुद्ध अर्थात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी स्वत: एम. डी. (मेडीसिन) आहेत. १९८५ पासून दिलासा मेडीकल ट्रस्टद्वारे आपल्या सामजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या बापूंनी संस्थेच्या माध्यामातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिर हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरापूर्वी धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या ‘मेथी’ येथे संस्थेतर्फे वैद्यकीय व आरोग्य शिबिर भरविले जात होते. यामुळे येथील आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमधील आरोग्य परिस्थिती सुधारली. हे गाव आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले. गावकर्‍यांमध्ये वेगळाच आत्मविश्‍वास आला. यानंतर ’कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. ’मेथी’ येथे काही वर्षे भरवीत असलेल्या वैद्यकीय शिबिराचा अनुभव गाठीशी होता. हा अनुभव गाठीशी घेऊनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून कोल्हापुरात वैद्यकीय व आरोग्य शिबिर भरविले जाऊ लागले.

हे शिबिर दोन दिवसाचे असते. परंतू याची पूर्वतयारी मात्र वर्षभर सुरु असते. या शिबिरासाठी सुमारे ४००० श्रद्धावान कार्यकर्ते सज्ज असतात, त्यातील सुमारे १००० श्रद्धावान कार्यकर्ते मुंबईहून जातात. त्यामध्ये निष्णात डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ देखील असतो.

आजारपणाला आमंत्रण देते ती अनारोग्यस्थिती आणि ती उद्भवते चुकीच्या सवयींमुळे. ह्या शिबिरीच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की अस्वच्छ पाणी, उघड्यावर शौच, केवळ परिसराचीच नव्हे तर शरीराचीही अस्वच्छता यामुळे आजारपणांना आयते आमंत्रण मिळत होते. सर्वच गावकर्‍यांमध्ये मध्यम व तीव्र स्वरूपाचा अ‍ॅनिमिया दिसून आला. त्यातच चुकीच्या समजुती, त्यामुळे येणारे अनारोग्य या सार्‍याचा विचार करुन केवळ वैद्यकीय सेवासुविधाच नाही, तर गरजूंना औषधांचे आणि नित्योपयोगी वस्तूंचे, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि क्रीडासाहित्य इत्यादींचे वाटप केले जाते. गावातील कुटुंबांची संख्या, कोणत्या भागात अशा वस्तू पुरविण्याची आवश्यकता आहे, याचे नीट सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर शिबिरासाठी तयारी सुरू होते. हे काम वर्षभर चालते आणि दोन दिवसाच्या शिबिरात अतिशय नियोजन पद्धतीने शिस्तबद्धरित्या, कोणतीही गडबड गोंधळ न होता सर्व आयोजन होते.

गावकर्‍यांना दंतमंजन, साबण, पाणी शुद्ध करण्याचे औषध, ऊवांचे औषध, गोधड्या, कपडे, भांडी अशा गोष्टीचे वाटप केले जाते. मुलींच्या केसांत जटा होऊ नयेत यासाठी कंगव्याचा देखील आवर्जून समावेश केला जातो. तसेच त्यांना स्वच्छतेबद्दलचे मार्गदर्शनदेखील केले जाते. महिलांसाठी लुगडी (साड्या – नऊवारी व सहावारी), बांगड्या व टिकल्यांचेही वाटप होते.

हे वाटप शिबिराच्या पहिल्या दिवशी होते. सकाळी लवकर वाटपाला सुरुवात होते. सर्वेक्षण केलेल्या गावात टेंपोमध्ये सामानांचे गाठोडे भरून श्रद्धावान कार्यकर्ते जातात. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या नावाने एक गाठोडे बनवलेले असते. २०१७ मध्ये ९२ गावातील ८७६६ कुटुंबांना वाटप केले होते. त्याचबरोबर इतर अनेक आवश्यक गोष्टींचे वाटप केले जाते. दिवसभराच्या मेहनतीनंतर जेव्हा सेवेकरी पुन्हा शिबिराच्या स्थळी येतात, तेव्हा त्यांना श्रमपरिहार म्हणून सत्संगाचे आयोजन केले जाते.

दुसर्‍या दिवशी वैद्यकीय शिबिरास सुरुवात होते. पहाटेपासून गावकरी व शाळेतील विद्यार्थी पेंडाखळेला येऊ लागतात. या शिबिरामध्ये कोल्हापूरमधील बर्‍याच शाळेतील विद्यार्थी हजेरी लावतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर येतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. हे गणवेश तयार करण्यासाठी सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रद्धावान मित्र चरखा योजनेच्या अंतर्गत चरखा चालवून लड्या बनवून देतात. या लड्यांमधून कपडा तयार होतो आणि त्याचाच गणवेष तयार करून या विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतो. श्रमदानातून निर्माण होणारे हे गणवेष या विद्यार्थ्यांच्या भविष्याला विलक्षण कलाटणी देऊ शकतात याचा अनुभव कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरात ठायी ठायी येतो. विद्यार्थ्यांना मोफत स्लिपर्सचे जोडही दिले जातात. शिबिराचे या भागात आयोजन होण्यापूर्वी अनेक गावकरी अनवाणी फिरत. लहान मुलांनी कधीही पायात स्लिपर्स घातलेल्या नव्हत्या. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पायात घालण्यासाठी नव्या कोर्‍या चप्पल मिळाल्या, त्यावेळी अनेक मुलांच्या चेहर्‍यावर आनंद व अप्रूप दिसून येत होते.

शिबिरात विद्यार्थ्यांना मोफत टोप्यांचे वाटप ही केले जाते. या शाळांची व शाळांमधून येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते आणि त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. या मुलांना आवश्यकतेनुसार व्हिटॅमीनची औषधेही मोफत दिली जातात. तसेच मुलांना सुका मेव्याचे पाकीट दिले जाते, जेणेकरुन त्यांना योग्य ती पोषणतत्त्वे मिळू शकतील. त्यानंतर मुलांना मेणबत्ती व काडेपेटीचे वाटप केले जाते, ज्यामुळे अंधारल्यावर वीज नसतानाही मुले अभ्यास करु शकतात. ह्या काडेपेट्या व मेणबत्त्या सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या १३ कलमी योजनेमधील ‘विद्याप्रकाश’ या योजनेअंतर्गत वाटण्यात येतात.

इतकेच नव्हे तर त्यांच्या शाळांना सुद्धा खेळण्यांचे सेट दिले जातात. जसे की दोरीवरच्या उड्या, रिंग्स, फुटबॉल, फ्रीसबीज्‌, क्रिकेटचा सेट इत्यादी. मुलांनी शाळेत येऊन आपले शिक्षण घ्यावे व ही पुढची भारतीय पिढी अधिक सक्षम व सुदृढ व्हावी यासाठी शिबीराचा हा शैक्षणिक पैलू अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या शिबीराचा लाभार्थी असणार्‍या दोन मुलांनी तर आज त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. हीच गोष्ट या शिबिराचे यश सांगण्यास पुरेसे आहे.

या सर्व वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करण्यात आला आहे. येथे एक उदाहरण बघता येईल, उवांचे औषध व फण्यांच्या वाटपांचे. केसात वापरण्यास फणी नसल्यामुळे जटा निर्माण होण्याचा धोका असता. लहान मुलींच्या डोक्यात अशा जटा निर्माण झाल्यास त्यांना देवदासी बनविण्याची जुनी चुकीची रीत होती. पण केसात जटा होतात, ते केस स्वच्छ न ठेवल्याने, ते नीट न विंचरल्याने. उवांचे औषध व फण्यांचे वाटप केल्यामुळे अनेक मुली या चुकीच्या रूढीच्या आहारी जाण्यापासून वाचल्या. यावरून या साध्यासुध्या वाटणार्‍या गोष्टीचेही महत्त्व अधोरेखित होते.

 या शिबिरात आसपासच्या गावातील अनेक गावकरी येतात. साधारणतः १० ते १२ हजार रुग्णांची नोंद दरवर्षी होते. वैद्यकीय विभागात रुग्णांची मोफत चिकित्सा केली जाते. त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. यामध्ये सामान्य तपासणी पासून एक्स-रेची देखील सोय केलेली असते. गरजूंचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे मोफत वाटप केले जाते. ईसीजीचा देखील समावेश या वैद्यकीय विभागात केलेला असतो. त्याचबरोबर दंतचिकित्सा सेवा ही पुरवली जाते. वर्ष २०१७मध्ये सुमारे १५ हजार हून अधिक रुग्णांची तपासणी निःशुल्क करण्यात आली. तर १३३ शाळांमधील एकूण ९३४८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

शिबिरात येणार्‍या प्रत्येक लाभार्थीला अन्नपूर्णा महाप्रसादम् अंतर्गत निःशुल्क भोजन दिले जाते. सकाळी शिबिरासाठी लवकर आपल्या गावातून निघून उपाशीपोटी उन्हातून, लांबून आलेल्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ जणू पर्वणीच. मनसोक्त अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे गावकरी आणि विद्यार्थी पाहिले की मन तृप्त होते. शिबिरातील या पंगतींमध्ये सुमारे ५० हजाराहून अधिक गावकरी जेवतात. यांना प्रेमाने आणि आग्रहाने जेवण वाढले जाते. तितक्याच प्रेमाने मोठमोठ्या भांड्यांमध्ये हे जेवण बनविले जाते. शेकडो स्वयंसेवक या सेवेसाठी श्रमदान करीत असतात.

या शिबिरामुळे या भागाचे चित्र पालटले आहे. नागरिक आरोग्याविषयक समस्यांविषयी जागृत झाले आहेत. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळले आहे. गावकर्‍यांच्या आरोग्यविषयक तक्रारी मोठ्याप्रमाणावर कमी झाल्यात. गावकर्‍यांना शरिराची व परिसराची स्वच्छता याचे महत्त्व पटून त्यांनी स्वच्छतेची सवयही अंगीकारली आहे. कुष्ठरोग रुग्णांची संख्या प्रकर्षाने कमी झाली आहे. संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. दूषीत पाण्याने होणारे आजार पूर्णतः नष्ट झाले आहेत. दरवर्षी या शिबीराचा लाभ घेणार्‍या गावांची आणि शाळांची संख्या वाढली आहे.

शिबिराचा लाभ घेतलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. इतकेच नव्हे तर शाळांचा निकालही चांगला लागत आहे. कुटुंब नियोजनाबाबत गावकर्‍यांना चांगली माहिती आहे. त्यांच्यामधील जागृकतेबाबत गायनॅकोलॉजिस्टही समाधान व्यक्त करतात. असे अनेक मुद्दे उल्लेखता येतील.

बापूंनी अर्थात् सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या सामाजिक कार्याचा पाया सदैव भक्ती आणि अध्यात्म हाच आहे. भक्तीच्याच पायावर नि:स्वार्थ सेवाकार्य उभे राहू शकते, असे बापू सांगतात. ‘कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर’ भक्ती व सेवा या दोन पायांवर उभे राहिले आहे. या मार्गाचा वापर करून जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्यास शिकलेले बरेच गावकरी या शिबिरात सहभागी होतात, त्यावेळी बापूंच्या शिकवणीची ताकद कळून येते. सद्गुरू बापूंना अर्थात श्रीअनिरुद्धांना सामान्य जन व रंजल्या गांजल्यांसाठी वाटणारी कळकळही त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून दिसून येते.