जुनं  ते सोनं

‘जुनं ते सोनं’ ही एक जुनी म्हण आहे. बर्‍याच वेळा अडगळीत टाकून दिलेल्या किंवा उपयोगात नसलेल्या कित्येक गोष्टी अचानक इतक्या उपयोगी वाटू लागतात की त्याचे मूल्य त्यावेळी सोन्यापेक्षा कमी वाटत नाही. सध्या ‘वापरा आणि फेका’ अर्थात यूज अँड  थ्रो

चा जमाना आहे. मात्र असे असूनही अनुभवातून साकारलेल्या ’जुनं ते सोनं’ या म्हणीचे महत्त्व अबाधित आहे. याच म्हणीतून मिळणार्‍या बोधावर आधारलेल्या ‘जुनं ते सोनं’ या उपक्रमाची २००२ साली सद्गुरु अनिरुद्धांनी (बापूंनी) घोषणा केली.

३ ऑक्टोबर २००२ साली तेरा कलमी कार्यक्रमाची घोषणा करताना, बापूंनी यातील एक कलम ‘वस्त्र योजना’ जाहीर करताना ‘जुनं ते सोनं’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. या उपक्रमाची घोषणा करून साध्यासाध्या गोष्टीतून आपण कशाप्रकारे आपली सामाजिक जबाबदारी पार पाडू शकतो, याची जाणीव बापूंनी श्रद्धावानांना करून दिली.

देशात सामाजिक दरी इतकी मोठी आहे की अनेक ग्रामीण भागात अंगावर घालण्यासाठी धड कपडे नसतात, मुलांकडे खेळणी नसतात. शिक्षण घेण्यासाठी पुस्तके व शालेय वस्तू नसतात. मात्र ज्यांच्याकडे त्या पुरेशा आहेत, त्याचे कधी कधी त्यांना मोल नसते. अनेक वेळा आपले जुने झालेले कपडे आपण असेच फेकून देतो. लहान मुलांची जुनी झालेली खेळणी अशीच अडगळीत पडून राहतात किंवा भंगारात विकली जातात. पुढच्या वर्गात गेल्यावर मागच्या वर्गातील शालेय पुस्तकांचीही अशीच स्थिती होते. मात्र आपल्यासाठी टाकाऊ असलेल्या किंवा कोणतेही मोल न उरलेल्या या वस्तू, ज्यांना नवीन गोष्ट विकत घेणे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या शक्य नाही, त्यांच्यासाठी सोनंच ठरतात. आपले जुने कपडे, खेळणी, पुस्तके या योजनेअंतर्गत दिल्या तर काय फरक पडू शकतो, हेही बापूंनी पटवून दिले. त्यानंतर सद्गुरु बापूंच्या मार्गदर्शनाने सद्गुरु अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनने ‘जुनं ते सोनं’ या प्रकल्पाची सुरुवात केली.

‘सद्गुरु अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ने मान्यता दिलेल्या उपासना केंद्रांवर तसेच ‘श्रीहरिगुरुग्राम’ (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे) येथे दर गुरुवारी श्रद्धावानांनी स्वेच्छेने आणून दिलेले जुने कपडे जमा केले जातात. हे कपडे जमा करताना ते स्वच्छ व फाटलेले नसल्याची खात्री संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. सुस्थितीतील कपडे ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळावेत हे संस्कार बापूंनी श्रध्दावानांच्या मनावर रुजवले आहेत.

‘जुनं ते सोनं’ सेवेचे व्यवस्थापन व अंमलबजावणीची पद्धत –

कपडे केंद्रांवर जमा झाल्यानंतर श्रद्धावान त्या कपड्यांचे वयोगटावरून वर्गीकरण करतात. लहान मुलांचे, मध्यमवयीन स्त्री-पुरुषांचे, तसेच वृद्ध स्त्री-पुरुषांचे वयोगटानुसार वर्गीकरण केले जाते. त्यानंतर प्रत्येक केंद्राजवळचे श्रद्धावान त्यांच्या विभागाजवळच्या गावांमध्ये जाऊन सर्वेक्षण करतात.

प्रत्येक गरजू कुटुंबात किती माणसे आहेत, याची मोजणी केली जाते. त्यात स्त्रिया, पुरुष व लहान मुले किती आहेत, या सगळ्याचा सखोल अभ्यास केला जातो. सर्वेक्षण झाल्यानंतर जमा झालेले कपडे पुरेसे आहेत का, याचाही आढावा घेतला जातो. कपडे पुरेसे नसतील तर केंद्रांमध्ये कपडे जमा करण्यासाठी निवेदन केले जाते. एकदा का पुरेसे कपडे जमा झाले की कपड्यांच्या वर्गीकरणाची सुरूवात होते.

कुटुंबांप्रमाणे गाठोडी तयार केली जातात. प्रत्येक कुटुंबाच्या गाठोड्यात त्या घरातील प्रत्येकासाठी कपडे असतात. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला कुटुंबाला एक नंबर दिला जातो आणि त्या नंबरने ते कुटुंब ओळखले जाते किंवा त्या गाठोड्यावर कुटुंबाचे नाव लिहीतात. असे करण्यामागचे कारण म्हणजे जेणेकरून ते गाठोडे कुणाला द्यायचे आहे हे कळते.

सगळी गाठोडी एकत्र बांधून टेम्पो किंवा अन्य गाडीत भरून सर्वेक्षण केलेल्या गावांमधे नेली जातात. गावात गेल्यावर पूर्वनियोजित मध्यवर्ती ठिकाणी श्रद्धावान प्रत्येक कुटुंबाचे नाव पुकारतात व त्या कुटुंबातील एक जण पुढे येऊन ते गाठोडे श्रद्धावानांकडून स्वीकारतो. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. ही मंडळी अत्यंत समाधानाने हे गाठोडे घेऊन घरी जातात. त्यांच्या चेहर्‍यारवचे ते भाव पाहून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

या योजनेत केवळ कपडेच नाहीत जुनी भांडी व खेळणीदेखील स्वीकारली जातात. गरीब कुटुंबाना या भांड्यांची व ह्याच कुटुंबातील मुलांना ह्या खेळण्यांची खूप आवश्यकता असते.

गेल्या काही वर्षांपासून ‘जुनं ते सोनं’ योजनेची व्याप्ती वाढली आहे. कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिरातील सेवेत ‘जुनं ते सोनं’च्या द्वारे संस्था कपडे, खेळणी, भांड्यांचे वाटप करीत आहेत.

कोल्हापूरच्या पेंडाखळे गावात हे वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाते. या शिबिराच्या खूप दिवस आधी काही श्रद्धावान मंडळी केवळ सर्वेक्षणासाठी तिथे जातात आणि प्रत्येक कुटुंबात कपड्यांची, भांड्यांची, खेळण्यांची किती गरज आहे त्याचे सर्वेक्षण करतात. परत या कपड्यांचे कुटुंबाप्रमाणे व त्यांच्या गरजांप्रमाणे गाठोडे बांधले जाते. शिबिराच्या दिवशी श्रद्धावानांकडून गरजूंना कपड्यांचे, खेळण्यांचे, भांड्यांचे व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जाते. काही गावांमध्ये स्वतः परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा जाऊन गावकर्‍यांना या वस्तूंचे वाटप करतात. त्यावेळी ह्या गावातील माणसांच्या चेहर्‍यावरचा आनंद हा वर्णनाच्या पलीकडचा आहे.

श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या ह्या जुनं ते सोनं या सद्गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या प्रेरणेने सुरु केलेल्या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबाना कपडे व गरजेच्या वस्तूंचा लाभ मिळाला. तसेच ती कुटुंबे बापूंच्या निरपेक्ष प्रेमाच्या सावलीत सुखाने राहू लागली. आणि सर्वांत विशेष म्हणजे श्रद्धवानांकडच्या अनेक जुन्या वस्तूंचे सोनं झालं.

Leave a Reply