रामरसायन

रामरसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपति के दासा।

हनुमान चलिसामधील या चौपाईत तुलसीदासांनी हनुमंताकडे असलेल्या रामरसायनाचा उल्लेख केला आहे. सर्व श्रद्वावान भक्तांना सहज घेता येणार्‍या रामनामाचे व रामकथेचे महत्त्व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी वारंवार आपल्या प्रवचनांमधून समजावून सांगितले आहे. 

हेमाडपंत श्रीसाईसच्चरितात रामकथेचा महिमा स्पष्ट करताना लिहितात-

रामकथेचा हाचि महिमा । तेथे विघ्नांचा न चले गरिमा ॥

म्हणजेच जेथे रामकथा चालते तेथे विघ्न उरूच शकत नाही, त्या विघ्नांचा आमच्यावरचा प्रभाव हा खूप क्षुल्लक रहातो. 

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापू) लिहिलेला ‘श्रीरामरसायन’ हा ग्रंथ रामनामाचे हे रसायन कसे आहे, हे विशद करून सांगतो. शरीरातील त्रिदोषांमध्ये (वात, कफ, पित्त यांमध्ये) जो असमतोल तयार होतो, त्याचे निराकरण करून जरा-व्याधिविनाशन करणारे द्रव्य म्हणजे रसायन. शरीरातील प्रत्येक इंद्रियाला आणि अवयवाला त्याचं त्याचं काम करण्याची श्रेष्ठ क्षमता व गती देणारं औषध म्हणजे रसायन. रामरसायन म्हणजे रामाचे सदा दास बनून रहाणे. आमच्या त्रिविध देहांवर (भौतिक, मनोमय व प्राणमय) कार्य करणारे रसायन म्हणजे रामरसायन.

हा ग्रंथ म्हणजे रामजन्मापासून अयोध्येत रामराज्य स्थापन होईपर्यंतच्या रामकथेचे जीवनसार आहे. यातील चित्रेसुद्धा त्या त्या कथेच्या अनुषंगाने आहेत. रावण हा प्रतीक आहे द्रुष्प्रारब्धाचा व तामसी अहंकाराचा, ज्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये भय उत्पन्न होते. दुष्प्रारब्धरूपी रावण आपल्या जीवनातून शांती-तृप्तीरूपी जानकीला पुरुषार्थरूपी रामापासून वेगळे करतो. अहंकार हा प्राण आणि काम, क्रोध, मोहासारखे षड्‌रिपू अशी मनाची मूलद्रव्यं असणार्‍या या रावणाचा वध रामाकडूनच होतो. मानवाला सतावणार्‍या अशा दुष्प्रवृत्ती व दुष्प्रारब्धाचा नाश होतोच. पण केव्हा? जेव्हा आपण रामाचे वानर बनतो तेव्हा. हे बापू ‘रामरसायन’ या ग्रंथात अतिशय सुंदरपणे सांगतात.

हा ग्रंथ वाचताना या ग्रंथातील प्रत्येक पात्र आपल्या समोर सजीव होऊन उभे राहते आणि रामनामाने पाषाणही जसे सहजतेने सागरावर तरतात, तसेच रामनाम आपले जीवन तारेल याबद्दल प्रत्येक श्रद्धावानांच्या मनात विश्‍वास निर्माण होतो. या ग्रंथात रामायणातील विविध पात्रे आपल्याला आपल्या जीवनातीलच विविध पैलू लक्षात आणून देतात. हा ग्रंथ आपल्यामधील रावणसदृश दुर्गुणांची जाणीव करून देऊन त्यांचा नाश करण्यासाठी, तसेच आपल्या जीवनात उचित बदल घडवून आणण्यासाठी एक सहजसोपा आध्यात्मिक मार्ग दाखवितो.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेला ‘रामरसायन’ हा ग्रंथ हे केवळ प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्रच नाही, तर आपले जीवन चैतन्याने, जिवंतपणाने आणि सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी असणारी एक आचारसंहिताच आहे. सर्वोच्च असणार्‍या ‘श्रीरामांची नि:स्वार्थ सेवा’ हेच प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील परमोच्च शिखर आहे आणि हाच ‘रामरसायना’चा खरा गाभा (आत्मा) आहे.

परमपूज्य सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘रामायणा’ सारख्या महान पवित्र ग्रंथातील सार श्रद्धावानांकरिता सहज, सुंदर शुद्ध मराठी भाषेमध्ये व सचित्र अशा स्वरूपात ‘रामरसायन’ ग्रंथाच्या स्वरूपात खुले करून दिले. श्रद्धावान या ग्रंथाचे अत्यंत प्रेमपूर्वक पठण करीत असतात. श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथेही रात्रपठणासाठी येणारे भक्त ‘रामरसायन’ या ग्रंथाचे प्रेमपूर्वक पठण करतात. ‘रामरसायन’ ज्याच्याकडे आहे अशा श्री हनुमंताचे गुणवर्णन असलेल्या हनुमानचालिसेसह सुंदरकांड पठणही बापूंच्याच मार्गदर्शनानुसार श्रद्धावान भक्त करीत असतात.

Leave a Reply